चांद्रयान-3 ने गाठला महत्त्वाचा टप्पा, भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; अंतिम प्रवास सुरु

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandrayan 3: भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या जवळच्या कक्षेत पोहोचले आहे. 17 ऑगस्टला दुपारी 1 वाजता प्रोपल्शन युनिटपासून वेगळे होऊन, विक्रम लँडरचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. म्हणजेच आजपासून विक्रम लँडर प्रज्ञान या रोव्हरसह चंद्राच्या दिशेने हळूहळू सरकू लागेल. यानंतर ठरल्याप्रमाणे 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर लँडिग करणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ISRO मध्ये उपस्थित असणार आहेत. 

संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या चांद्रयान-3 ने आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. विक्रम लँडर चांद्रयान 3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीपणे वेगळं करण्यात आलं आहे. आता चांद्रयानला फक्त 100 किमी अंतर पूर्ण करायचं आहे. चंद्राच्या चारही बाजूंनी दोन वेळा चक्कर मारल्यानंतर त्याला आपली उंची आणि गती कमी करायची आहे. यानंतर 23 ऑगस्टला संध्याकाळी पावणे सहा वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिग करेल. 

ISRO ने दुपारी 1 वाजता प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळं करण्याची कामगिरी पूर्ण केली. दरम्यान यानंतर विक्रम लँडर गोलाकार कक्षेत फिरणार नाही. ते पुन्हा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरेल. यानंतर, 8 आणि 20 ऑगस्ट रोजी डीऑर्बिटिंगद्वारे, विक्रम लँडर 30 किमी पेरील्युन आणि 100 किमी अपोलून कक्षेत ठेवले जाईल.

पेरील्यून म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागापासून कमी अंतर, तर अपोलून म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागापासून अधिक अंतर. परंतु इंधन, चंद्रावरील वातावरण, वेग इत्यादींवर अवलंबून या कक्षेत किरकोळ फरक असू शकतो. पण याचा मोहिमेवर काही फरक पडणार नाही. पण एकदा 30 किमी x 100 किमीची कक्षा गाठल्यानंतर इस्रोसाठीसर्वात कठीण टप्पा सुरू होईल. तो म्हणजे म्हणजे सॉफ्ट लँडिंग.

30 किमी अंतरावर आल्यानंतर विक्रम लँडरचा वेग कमी होईल. चांद्रयान-3 धीम्या गतीने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले जाईल. हा सर्वात कठीण टप्पा असेल. 

Related posts